Tuesday, April 19, 2011


'माझी सखी.......निराळी!'


आज 'सखी' दिसली.

म्हणजे आज खऱ्या अर्थानं 'सखी'  भेटली.

निमित्तही असंच काहीस निराळं! सखीच्या मांडीवर डोक ठेऊन मी नुसताच तिच्याकडे पहात विसावलो होतो जसा कल्पवृक्षाच्या सावलीखाली! सखी माझ्या कपाळावरून हात फिरवित गात होती.......

'जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते.....वाट पहाते'

या काव्यपंक्ती सखीच्या कंठातून नुसत्याच बाहेर पडल्या नाहीत तर मला नादमुग्ध करून गेल्या. लताला सुद्धा कधी एवढा 'वन्समोअर ' मिळाला नसेल तेवढा मी आज ते गाणं सखीकडून ऐकण्यासाठी अधीर झालो होतो. गाण्याच्या प्रत्येक अक्षराला स्व:ताच  एक वजन होतं, प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ होता, प्रत्येक शब्दांनी गुंफलेल्या या काव्यपंक्तीला भावनिक ओढ तर होतीच......पण त्यापेक्षा सुद्धा सखीच्या कंठातून आलेल्या या सुरेल स्वरांना प्रेमाची, मायेची, कारुण्येची अन आपुलकेची झालर होती. त्यामुळे आज हे गाणं नुसतं सुरेलंच झालं नव्हत तर पारिजताका सारखं फुलून आलं होतं, चाफ्यासारखं सुगंधी झालं होतं, गुलाबासारखं टवटवीत तर होतंच पण निशिगंधाची ओढही तितकीच होती.

सखीचंच  गाणं आज का माझ्या मनाला एवढ भावलं?
.......कारण ते फक्त सखीच गाणं होतं. अनेक गोष्टींची ज्याप्रमाणे उभ्या आयुष्यात उत्तरं मिळत नाहीत त्याचप्रमाणे सखीच गाणंही! याचंही उत्तर मिळणार नाही. 
'सखी एक स्वप्न आहे', 'सखी एक कोडं आहे', 'सखी एक वेड आहे'..........म्हणूनच सखी इतरांपेक्षा वेगळी आहे.

'सखी' खरंच तू आजही चांगली गातेस आणि अजूनही तुझा आवाज 'तसाच ताजा आहे'
'चल उगाच कौतुक करू नकोस.'

खरंच.......तेवढे मला गाण्यातलं कळतंय आणि हो डोळ्यातलही. सखी खर सांगू? तू तुझ्या गळ्यानं गातच नाहीस मुळी...........तू गातेस ते तुझ्या डोळ्यानं........म्हणूनच जेंव्हा जेंव्हा हे गाणं मी तुझ्याकडून ऐकतो तेंव्हा तेंव्हा मला फक्त तुझ्या डोळ्यातील भाव दिसत असतात.

'वेडा आहेस'......अगदी पूर्वी होतास तसाच.......
हो, आहेच मुळी......पण वेड कशाचं यावर त्या वेडेपणाची व्याख्या ठरत असते आणि खरंतर माणसानं थोडं वेडं असावच नाहीतर जीवनातील आनंदच उपभोगता येत नाही. निस्वार्थीपणाने आपण हे वेड घ्यावे आणि स्व:ताला झोकून द्यावं. आणि माझ्या या वृत्तीला जर तू वेड म्हणत असशील तर सखी मी आहेच...... 
काही क्षण आमच्यात अशीच निषब्धता होती.......शांत झालेल्या समुद्रासारखी अन फुलू लागलेल्या चांदण्यासारखी!

'अरे असा बघतोस काय? बोल ना?'
काय बोलू? किती बोलू? आणि कसे बोलू? ज्यावेळी शब्द अपुरे पडतात त्यावेळी त्याची जागा नजरेनी घेतलेली असते आणि खर सांगू? ......म्हणूनच आज तुला पुन्हा मी नव्यानं पाहतोय....जाणतोय....आणि समजूनही घ्यावयाचा प्रयत्न करतोय.

काय काय आठवतेय तुला? माझी आठवण होत होती तुला? सखी विषयाला बगल देत होती....
'आठवण'......मी नुसताच हसलो,
'का हसलास?'....'आठवण येत नव्हती का?'
येत होती ना.
किती वेळा?
यायची मधेच केंव्हातरी......
आणि?.......
आणि तेंव्हा ढवळून टाकायचीस सगळं.
'मला बरं वाटावं म्हणून म्हणतोस?'   
'मुळीच नाही, खरंच सगळं ढवळून टाकतेस, आठवतेस तेंव्हा! संसार हा धीरगंभीर, उदात्त रागदारीसारखा असतो, तास तास चालणारा, ठाय, विलंबित, द्रुत अशा अंगानं फुलणारा, केंव्हा केंव्हा फार संथ वाटणारा, उदास करणारा, कंटाळा आणणारा, आणि मध्येच तुझ्यासारखी सखीची आठवण, ही मोठा राग आवळून झाल्यानंतरही ठुमरीसारखी असते, दहा मिनिटांत संपणारी, पण सगळी मैफल गुंगत ठेवणारी, मरगळ घालवणारी.

पुन्हा सखीने पूर्वीच्याच चातुर्यानं मला गप्प केलं, सखी सर्व जाणत होती पण तरीसुद्धा तिला आणखी खोलात जायची इच्छा नव्हती.........भूतकाळ हा भूतकाळच तिला ठेवायचा होता. सखी बोलत नव्हती......पण तिच्या डोळ्यातील भाव मला समजावत होते.

'अरे......... त्याचं काय असतं की काही काही रागदारीत काही काही स्वर वर्जच असतात त्याला तू काय करणार? म्हणून तुझ्या आठवणीत, सहवासात मला रमता येत नाही. वर्ज झालेला स्वर वाईट असतो म्हणून वगळायाचा नसतो, तर एक राग उभा करायचा असतो. त्यासाठी आपण तो खुशीनं विसरायचा असतो. वाद्यातला तेवढ्या पट्या उपटून फेकायच्या नसतात, त्यांना फक्त चुकवायचं असतं ......कळलं? .....सखी जीवनाचं मर्म सांगत होती.
  
'तुझ पटतंय गं, नाही अस नाही. पण सप्तकातले किती स्वर चुकवायचे?'
सखीनं आपल्या हाताचा तळवा माझ्या ओठावर ठेवीत मला गप्प केल अन 'बाय' म्हण अस सांगत स्वप्नांत रमण्यासाठी सिध्द झाली.

माझी सखीवरची नजर काही हलत नव्हती तरी मी अनाहूतपणे विचारलं........
'पुन्हा कधी?'
'जेंव्हा पुन्हा योग येईल तेंव्हा'.........सखीचं नेहमीचंच उत्तर.
'म्हणजे जेंव्हा आपण म्हातारे झालेले असू तेंव्हा?' माझा सखीला पुन्हा प्रश्न...  
सखी माझ्या केसांतून हलकेच हात फिरवित मोठ्यांदा हसली.......
'तस्साच वेडा आहेस'

मी अगतिकपणे सखीला बिलगलो, कुशीत विसावयाचा प्रयत्न केला......आणि जाणवलं......की, सखीचं 'जिवंत दिल' अजूनही गात होतं.......

'दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहतांना, 
कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना,
नकळत आपण हरवून जावे स्व:तास मग जपतांना,
अन मग डोळे उगडावे मग ही दिवा स्वप्नं पाहतांना,'

'आयुष्य हे............!!!'
  
  

No comments:

Post a Comment