Showing posts with label सुखं. Show all posts
Showing posts with label सुखं. Show all posts

Tuesday, November 16, 2010

सुखं



माणूस आयुष्य जगतो कशासाठी? माणूस आयुष्यात जे करत असतो किंवा करवित असतो, ते सर्व कशासाठी? नावलौकिकासाठी, पैशासाठी, समाजासाठी की स्वतःच्या सुखासाठी? मला तर वाटत की माणूस आयुष्यात जे काही करत असतो ते सुखं नावाच्या मृगजळासाठी. धावून धावून थकतो तरीही तो या मृगजळा मागे धावायचे काही थांबत नाही अन त्याचा पिच्छा ही सोडत नाही. सुखासाठी तो काहीही करू इच्छितो, शकतो, पण .....पण तरीही माणूस सुखी असू शकतो? .....नाही ....नाही माणूस हा या कालचक्रात कधीही सुखी राहू शकत नाही. कितीही गोष्टी त्याला मिळाल्या तरी त्याची भूक ही संपताच नाही. त्याचा आत्मा हा सदैव अतृप्तच राहतो. 

जगी सर्व सुखी असा कोण आहे? ........कोणीही नाही ! अन असणारच नाही. याचं  कारण एकंच........आणि ते म्हणजे माणसाचं मन !  जोपर्यंत माणसाचं मन जीवंत राहत तोपर्यंत तो अतृप्तच राहतो.

मन !

किती महान रहस्य लपलेली असतात फक्त या दोन शब्दात ! खरंच काय आहे हे मन म्हणजे ? जगातील प्रत्येक माणूस म्हणजे मनोभावनांच्या असंख्य दोरखंडानी जखडलेला एक हत्तीच नसतो का ? जिथल्या तिथेच एक सारखा हलणारा, स्वतःला स्वतंत्र आणि सामर्थ्यवान  मानणारा तरीही अस्वस्थ असणारा !    
      
सुखं म्हणजे नक्की काय ? सुखाची नक्की व्याख्या तरी काय ? माणूस सर्वांगाने सुखी असा कधी समजायचा ?......कठीण आहे याचं उत्तर. सुखाच्या अनेक व्याख्या  येतील परंतू सुखाची व्याख्या सांगणारा माणूस स्वतः सुखी असू शकेल ? ज्याला सुखं म्हणजे काय हेच जर माहित नसेल तर त्याने काय बोलावे? खरंच मला सुखं म्हणजे काय ? हेच अजून कळलेले नाही आणि जे समजले, उमजले ते एवढेच की सुखाला फक्त दोन गोष्टी हव्या असतात, .....फक्त दोन....आणि त्या म्हणजे 'तन आणि मन' !

.......'तन आणि मन' यांनी तृप्त असणारा आत्मा म्हणजे सुखं. मी सुखाची एवढीच व्याख्या करू शकतो. या व्यतिरिक्त सुखं म्हणजे काय मला माहित नाही.

तुला माहित आहे?.....सांगशिल ?......

जीवन म्हणजे म्यानातल खड्ग ! माणसाचं शरीर हे म्यानासारख असतं आणि त्याचं मन हे त्या म्यानातल्या खड्गाच्या तीक्ष्ण पात्यासारख असतं. या जीवनरूपी खड्गाला आत्मारूपी मुठ असते. म्हटलं तर त्या मुठीचा त्या खड्गाशी व त्या म्यानाशी संबंध आहे अन म्हटलं तर नाही. पण मुठच नसती तर ते खड्ग चालेल का? म्यानाला शोभा येईल का? आत्म्याशिवाय जसं शरीर तसंच म्यानाचही.  ना शरीराला अर्थ ना मनाला !

म्हणूनच 'तन आणि मन' तृप्त असण हेच या जीवनातील सुखं आहे, अमृत आहे. पण ........पण ......याही गोष्टी माणसाच्या एकट्याच्या हातात नसतात. या दोन्ही गोष्टींसाठी त्याला दुसऱ्याचा आधार हा घ्यावाच लागतो. तसं पाहिलं तर जीवनाला सर्वांगान पूर्णत्व येत ते जोडीदाराच्या सहवासान. म्हणूनच सुखाला सावली ही असावीच लागते कारण टाळी कधीच एका हातान वाजत नसते, तर दुसरा हात हा लागतोच....फक्त.....
.....फक्त तो हात आपलाच नसावा.