Sunday, December 19, 2010

"अशी पाखरे येती....."


"अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगत-सांगत, दोन दिसांची नाती."

खरंतर मी हे काव्य फारसे ऐकत नाही. ऐकत नाही म्हणजे भावनांच्या बांधिलकीन मन असहाय्य होत म्हणून. पहाटेच्या आरंभीच हे शब्द कानावर पडले आणि मन बेचैन होऊ लागले. तसं पाहिलं तर हे काव्य अंतकरणाला भिडणारं आहे. भावनांच्या चक्रव्युहात शब्द व  सूर गुंतलेले पूर्णपणे जाणवतेय म्हणूनच ज्याज्यावेळी मी हे शब्द ऐकतोय त्यात्यावेळी माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहतात. हृदयापासून आलेल्या भावनांना माणूस रोखू शकत नाही हेच खरे.

तू म्हणालीस, रक्तापेक्षा या जगात अश्रूच जास्त पवित्र असतात.कारण तू ते अनुभवलयस......खरंच आहे हे. रक्तात संकर होऊ शकतात पण अश्रू निर्मळ गंगा आहे. रक्ताची नाती तुटू शकतात. पण अश्रुंच नातं तुटत नाही म्हणूनच मी सुद्धा रक्तापेक्षा अश्रुंनाच जास्त महत्व देतो.

जाणाऱ्या माणसाला आपण कधीच रोखू शकत नसतो. परंतु त्या माणसाबद्दल आपल्याला प्रेम का बरं असावं? आपण ज्याच्याकडे अभिमानानं, आदरानं पाहतो अशी माणस आपल्या आयुष्यात क्षणभरासाठी का म्हणून येतात? आणि का म्हणून आपण त्यांच्याकडे आकर्षिले जातो? खरंच या प्रश्नांना काहीही उत्तरे नाहीत. म्हणतात ना माणूस जसा नेहमी एकता असतो तसे त्याचे मनही! आणि शेवटी आपल मन हे आपणच मरावयाचे असते. आपल्या विरुध्द तक्रार घेवून ते कोठेही जात नाही, कोठेही बोलू शकत नाही. परंतु ज्या माणसाचं 'दिल' कुठेतरी जिवंत आहे, त्या माणसाला ह्या सर्व गोष्टींबद्दलच प्रेम असतं. आणि प्रेम निर्माण व्हावयास आकर्षणाची  जरुरी नसते तर सहवासाची गरज असते. जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त म्हणून तितकीच आपुलकीही जास्त!
  
कुठतरी मी वाचलं होतं की माणसानं एकदा जीवन हे जगण्यासाठी आहे हे मान्य केलं की, ते जीवन जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे जगावं. पण चांगले जगण्यासाठी पैसाच हवा असतो असे नाही.......हवा असतो मनाचा उमदेपणा, हवी असते रसिकता!

तुला माहित आहे, जीवन कसं असावं? तर ते जंगलातून अवखळपणे वाहत जाणाऱ्या झऱ्याप्रमाणे असावे - प्रवाही, नितळ, पारदर्शक!

जाता जाता तुला एवढेच म्हणावेसे वाटतेय,

"कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी,
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजूनही गाती"
      

Sunday, December 12, 2010

'ती आणि तिचा मी'



आज बऱ्याच दिवसानंतर कोरा करकरीत कागद आणि शाईनं भरलेलं पेन हातामध्ये होते. पण काय लिहावयाचे हेच कळत नाहीय. कळत नाही म्हणण्यापेक्षा विषय मिळत नाही, आज शब्दांना पुढे सरकावेसे वाटत नाही, शब्दाविण वाक्य पूर्ण होत नाहीत आणि त्यांना दिशाही मिळत नाहीय. माझ्या मनामध्ये आज विचारांची इतकी गुंतागुंत आणि गर्दी झालीय की मी मलाच हरवून बसलोय. आज कुठे हरविल्यात या सर्व गोष्टी? का थांबलेय माझी लेखणी? खरंच का मी सर्व काही विसरलोय? खरंच का मला आज काहीही आठवत नाहीय? का मन अस बेचैन होतंय?.....नाही.....नाही मला.....नाही कळत......तू सांगशिल?  

.....नाही, नाही, तू काहीच नाही विसरलास आणि हो विसरशील तर कसे? कशा विसरशील तू सगळ्या आठवणी? कशी विसरशील तू सुखदु:खाची तुझीच कहाणी? कसे विसरशील तू तिला आणि कसे विसरशील ते नाजूक जोपासलेले क्षण?

....खरंय तुझे! बाल्यावस्थातील निरागसता संपली, कुमारवयातील आकर्षण संपले, तरुणाईचा जोश ओसरत चालला म्हणून थोड्याच आठवणी पुसल्या जाणार? आठवणी त्या आठवणी, मग त्या सुखद असोद वा दु:खद...त्या आठवणारच.....म्हणूनच दोन दशकामागे घडलेल्या गोष्टी एखादा चित्रपट पुढे सरकावा तसा आज माझ्या डोळ्यासमोरून सरकतो आहे. फरक आहे तो कृष्णधवल ते रंगीत चित्रफितींचा. 

आठवतात मला 'ते' दिवस. आठवतात 'त्या' आठवणी. आठवतो तो तिचा बाल्यावस्थातील निरागस चेहरा. आठवतंय ते अल्लड आणि नटखट वागण आणि आठवतोय तो डोळ्यातील निष्पाप भाव! आठवतात त्या शेजारी बसून मारलेल्या गप्पा..... आठवते 'ते' तुझं बघणं!....आठवते ते घर...आठवतात त्या जिन्याच्या पायऱ्या आणि आठवतो तो तुझ्या नाजूक पायांचा होणारा मंजुळ आवाज! आठवते ती तुझी खोली.....आठवते ती पहाट आणि आठवतो तो चहाचा कप!.....आठवतेय 'धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना'...'अजून आठवे ती...', आठवते ती जगजीत-चित्राची तुझी आवडती गझल.....आणि आठवतात ती 'आठवणीतली सर्व गाणी'! 

तुला माहित आहे?.....एखादं कमळ पकडायचं म्हणून भुंगा भ्रमण करीत नसतो आणि भुंग्यान आपल्याकडे पहावं म्हणून कमळ फुलत नसतं. फुलणं हा कमळाचा धर्म असतो आणि भुलणं हा भुंग्याचा स्वभाव असतो. म्हणूनच आपण कमळाकडे आणि भुंग्याकडे बघून 'फुलावं कसं आणि भुलाव कसं' हेच शिकावं. आणि हे शिकत असतानाच कमळ फुलतं होतं आणि भुंगा भुलत होता. कमळाला कळत नव्हतं की भुंगा आपल्यासाठी भ्रमण करतोय आणि भुंग्याला उमजत नव्हतं की कमळ आपल्यासाठी फुलत नाहीय. कमळ कधी फुलून आलं आणि निघून गेलं हे भुंग्याला कळलंच नाही.....
भुंगा मात्र वेड्यासारखा भ्रमण करीत राहिला कमळासाठी! 


माणसानं एकदातरी समुद्रकिनारी जावं आणि अनुभावावित 'ती सुखदु:ख' ! वाळूचे आपण मनोरे बांधावेत, घरटीही बांधावित आणि अचानक एका लाटेनं ते उध्वस्त करावेत. पुन्हा जोमानं आपण ते बांधण्याकरिता धडपडावे आणि वेड्या आशेनं ते पूर्ण होईल अशी वेडी स्वप्नं पहावित......पण पुन्हा तीच लाट....आणि पुन्हा तेच भंग पावलेलं अधुरं स्वप्न! .... लाटेला कळत नसतं की आपण कुणाचीतरी स्वप्न उध्वस्त करतोय आणि घरट बांधणा-याला  कळत नसतं की स्वप्न साकार होणं आणि भंग पावणं यामध्ये फक्त चार पावलांच अंतर असतं!....हा डाव अर्ध्यावरती मोडत असतो तरीही आपण हा भातुकलीचा खेळ खेळतच असतो......तिच्यासह.....!     



जाऊदे, आज काही चिंचा गोळा करायच्या नाहीत की म्हातारीचे उडणारे केस पकडायचे नाहीत, आईस्क्रीमच्या लाल गोळ्याची ओढ नाही की पतंगामागे धावायचेही नाही. लगोरी नाही की विटीदांडू नाही.....आहेत त्या फक्त आणि फक्त 'आठवणी'..........तू म्हणालीस, तो भूतकाळ आहे 'विसर' ! पण भूतकाळ असा थोडाच विसरला जातो?...

माणूस जगतो तोच मुळी भूतकाळावर! जोपर्यंत त्याच 'मन' जिवंत आहे तोपर्यंत तो भूतकाळातील आठवणी आठवत असतो. आठवणी या सुखदही असतात आणि दु:खदही! सुखद आठवणीना कवटाळून आपण पुढचा प्रवास करावयाचा असतो आणि दु:खद आठवणी म्हणजे मनातील साठलेली जळमट.....कधीतरी साफ ही करायचीच असतात. भूतकाळ मला आज असाच मुद्दाम आठवावा लागला......न विसरलेल्या आठवणी पुन्हा नव्यानं जाग्या करायच्या होत्या......

.....कोरा करकरीत कागद आणि भरलेलं शाईचं पेन शब्दांची वाट पहात होते. पण शब्द थांबले होते, त्यांना दिशा मिळत नव्हती...कारण आज मनावर विचारांचं संपूर्ण वर्चस्व होतं आणि या विचारात होती फक्त 'ती आणि तिचा मी'!
                                
 .....सखी, बघ तुलाही आठवतोय का........'मी आणि माझी तू' ! 

Sunday, December 5, 2010

अजून आठवे 'ती'...


ती अशीच एक संध्याकाळ होती, अशीच म्हणजे रोजच्यासारखी शांत ! बागेतील हिरव्यागार गवतावर पहुडलो होतो. वाऱ्याची झुळूक थंडीचा गारवा सांगत होती, ऊन अन सावलीचा लपंडाव तर सुरूच होता. 'सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का?'.....असे फडके आपल्या हळुवार आवाजात गात होते.  शेजारील गरम चहाचा कप थंडीचे अस्तित्व नाहीसे करण्यासाठी धडपडत होता. समोरील वृक्षांवर राघू-मैनेची काहीतरी हितगुज चालली होती. माझी नजर नकळत त्या दोघांवर स्थिरावली अन मी माझे मलाच विसरून गेलो. शरीरान मी गवतावर होतो परंतु मनानं मी केंव्हाच दूरवर जावून पोहोचलो होतो. माझ्या मनावर आता विचारांचं पूर्ण नियंत्रण होतं. माझ्या मेंदूची चक्रे अतिशय वेगानं फिरत होती. माझ्या मनात 'ती' होती, माझ्या विचारात 'ती' होती, माझ्या भोवती 'ती' होती आणि माझ्या नजरेतही 'तीच' होती. मला आता कशाचेही भान राहिले नव्हते. शेजारील कुठल्याही अस्तित्वाची जाण राहिली नव्हती, माझं माझ्तावर नियंत्रण नव्हत. मी माझा राहिलेलो नव्हतो, 'तिचं' माझ्यावर नियंत्रण होतं. माझा चेहरा स्थिर आणि गंभीर असावा  म्हणूनच पक्षांनीही आपली किलबिल आता थांबविली होती. समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटा आज माझ्या मनांमध्ये थैमान करीत होत्या. मनामध्ये विचारांची आज जणू भरतीच आली होती. मी गंभीर होत होतो; माझं हास्य कुठतरी लुप्त पावलं होतं. मी तिच्या कालचक्रात पूर्णपणे गुरफटलेलो होतो. मला फक्त 'ती' हवी होती......फक्त 'ती'! तिच्या शिवाय माझं जीवन म्हणजे हृदयविना शरीर अस माझं मन माझ्या हृदयाला समजावीत होतं. तिचं माझ्यापासून क्षणभरासाठी दुरावण हे सुद्धा मला आता असहाय्य होत होतं. तिच्या प्रेमाच्या सावलीत अन मायेच्या आधारात राहण्यासाठी मी धडपडत होतो.    

अचानक माझ्या चेहऱ्यावर दव जमू लागल्याचे मला जाणवू लागले अन मी हलकेच माझे डोळे बाजूला फिरविले.....तर.....तर.....ते दव नव्हते,.....तर.....'ती' माझ्या शेजारी अश्रू ढाळीत बसली होती. तिचा मायेचा हात माझा चेहरा गोंजारीत होता, तिला मला काहीतरी सांगावयाचे होते पण शब्द फुटत नव्हते. 'ती' नुसतेच आपल्या नयनांनी सांगावयाचा प्रयत्न करीत होती पण तिचा स्पर्श बरंच काही सांगून जात होता.  'तिच्या' दु:खाची तीव्रता ही माझ्या दु:खापेक्षा कितीतरी जास्त होती तरी 'ती' आज मला समजावून घेण्याचा अन समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होती. माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू जमा झाले होते, आणि मी लहान मुलासारखा तिच्या कुशीत रडत होतो, माझ्यासाठी, माझ्या अश्रुसाठी 'ती' हुंदके देत होती. मी रडत होतो ते जीवन कस जगावं हे न समजल्यामुळे अन ती हुंदके देत होती ते तिला बालवयात झालेल्या वेदनांसाठी ! 

सूर्य अस्ताला चालला होता, राघू-मैनेची आपापल्या घरट्यांकडे जाण्याची धडपड चालली होती....आम्ही मात्र तसेच स्तब्ध होतो, निरभ्र आकाशाकडे बघत अन लखलखणाऱ्या चांदण्याच्या शोधात......उरलेल्या आयुष्यातील सुखाचे क्षण मिळविण्यासाठी आणि एकमेकांना देण्यासाठी....

........शेजारील थंडगार चहाच्या कपात दुधाची साय वाऱ्यासोबत तरंगत होती आणि कुठेतरी..... कुणीतरी...गात होतं ....... 
 '.........तू अशी जवळी रहा!'