Saturday, November 13, 2010

जीवन! 



सुखं दु:खाच्या उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेलं एक नाजूक वस्त्र म्हणजे जीवन! जीवन म्हणजे सुखदु:खाचा एक प्रवास - जन्मापासून मृत्युपर्यंत, आशा आकांशानी भरलेला प्रचंड महासागर म्हणजे जीवन! जीवन म्हणजे गाणे - कधीच न संपणारे! भग्न स्वप्नांचा विचार करीत, येणाऱ्या स्वप्नांची आशा करीत राहणारे एक जिवंत शरीर म्हणजे जीवन! सुखाच्या शोधात तरंगणारी नौका म्हणजे जीवन!

जीवन म्हणजे काय? ........कधीही न उलगडणारे एक कोडे!

अशाच प्रेमाच्या शोधात भटकणाऱ्या माझ्यासारख्या वेड्याचं हे एक जीवन आहे. कधीही न कळलेलं, कधीही न संपणारं अन कधीही न उलगडणार. झाकल्या मुठीत सर्व काही असणारं, मुठ उघडली असता काहीही नसणार. सुखाचं आवरणं असणारी दु:खाची ठेव. सुखाच्या मृगजळामागे धावणाऱ्या वेड्याचं एक केविलवाण जीवन......कधीही हाती न लागणारं. सुखाला अनेक चेहरे असतात पण दु:खाला मात्र एकाचं. क्षणापुरते का असेना सुखांत कशाचीही अपेक्षा नसते, दु:खात प्रेमाचा आधार हवा असतो, अन त्या आधारालाच जीवन हे नाव द्यावयाच असतं. खरंच किती सोप्या आहेत जीवनाच्या व्याख्या.......सुखदु:ख म्हणजे जीवन! पण ही सुखं आपल्याच पायदळी तुडवीत, दु:खाचं भलंमोठ ओझं आपल्या खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या माझ्यासारख्या भटक्याच्या जीवनाची व्याख्या काय? .......कधी कळलीच नाही. कळाले ते एवढेच की दु:खावर दु:ख उभं राहून जी माझ्यासारख्यांची व्यथा निर्माण होते ते म्हणजे वेड्याचं जगण! ..........की ज्याला जगण्याचाच आनंद लुटता येत नाही. वटवृक्षाच्या सावलीत दु:खाचा काळोख मोजणार माझ हे मन. समाधानाला तिलांजली देऊन दु:खाची आरती करणार हे मन. नैराश्यान पछाडलेलं हे बेफाम मन. तो माणूस दुसऱ्याला सुखं देणार? सुखासारख्या या गोड शब्दाचा हा अपमानच नाही का? .......तर अशा या मूर्खाच हे छोटस जीवन, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याऐवजी अंधारातून अंधारातच नेणारं. वाळवांटासारख्या ओसाड पहाडासारखे रुक्ष, पाण्याचा थेंब नसणाऱ्या नदीच्या पात्रासारख बकाल. पालवीचा मागमूसही नसणाऱ्या वृक्षासारख निस्तेज!
   
वि. स. खांडेकर लिहितात,
"भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाने मन केवळ साखरदंडानी करकचून बांधून ठेवू नये. त्याला भविष्याच्या गरुडपंखाचे वरदानही लाभले आहे. एखाद स्वप्न पाहण, ते फुलविण आणि ते सत्यसृष्ठीत उतरावं म्हणून धडपडण, त्या धडपडीचा आनंद लुटण आणि दुर्दैवानं ते भंग पावण.........तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामाग धावण हा मानवी मनाचा धर्म आहे".  

खंर आहे हे पण .......पण जीवनात घडलेल्या भग्न स्वप्नांना माणूस सहजासहजी विसरू शकतो? .......नाही.......नाही; त्या........त्या दु:खाची तीव्रताच इतकी असते की सुखांची शक्तीच कमी पडते. कारण सुखाला वाटेकरूच खूप असतात, दु:खात कोणी विचारीत नाहीत. अन त्या भग्न स्वप्नांनी रक्ताळलेल्या पायाच्या वेदना ह्या फक्त त्या तुकड्यावरून चालणाऱ्या माणसालाच समजू शकतात. तडा गेलेली काच पुन्हा जोडू शकत नसतो तसंच माणसाच्या मनाचंही असतं. कारण तडा गेलेल्या मनाला दुसऱ्यांचे अश्रूसुद्धा थोपवू शकत नाहीत. म्हणूनच माझ्यासारख्या माणसाला दु:खातच जगायचंय, दु:खातंच डुबायचंय, दु:खातंच बागडायचं असतं, दु:खातंच फुलायचं असतं. दु:खातंच राहायचं असतं..........

........फक्त.........फक्त सुखाच्या न दिसणाऱ्या मखमली आवरणाखाली!         

No comments:

Post a Comment